Monday, November 30, 2015

भेट

भेट
वाटलं कधी भेटावसं
तर...
वाऱ्याची झुळूक होउन ये,
अलगद स्पर्शाने गोड
गालावरती चुंबन घे..!!
वाटलं कधी भेटावसं
तर...
पावसाची सर होउन ये
चिंब चिंब भिजवुनी
मिठितला आनंद दे..!!
वाटलं कधी भेटावसं
तर...
पाव्यातला सूर होउन ये
गोड गळयातील आवाजाने
हृदयाला तू साद दे...!!!
-मंजूळा हाडके

रंग पाण्याचे

मराठी भाषेची सुंदरता
👌
रंग पाण्याचे

'पाणी'शब्द हा असे प्रवाही
वळवू तिकडे वळतो हा
जशी भावना मनात असते
रूप बदलते कसे पहा

नयनामध्ये येते'पाणी'
अश्रू तयाला म्हणती
कधी सुखाचे,दुःखाचे कधी
अशी तयांची महती

चटकदार तो पदार्थ दिसता
तोंडाला या'पाणी'सुटते
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग 'पाणी' येते

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी
म्हणती अविरत 'पाणी'भरते
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी 'पाणी'जाते

वळणाचे 'पाणी' वळणावरती
म्हण मराठी एक असे
बारा गांवचे 'पाणी' प्याला
चतुराई यातूनी दिसे

लाथ मारूनी'पाणी'काढणे
लक्षण हे तर कर्तृत्वाचे
मेहनतीवर 'पाणी' पडणे
चीज न होणे कष्टाचे

उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो
'पाण्या'त पाहणे गुण खोटा
'पाणी'दार ते नेत्र सांगती
विद्वत्तेचा गुण मोठा

शिवरायांनी कितीक वेळा
शत्रूला त्या 'पाणी'पाजले
नामोहरम करून अपुले
मराठमोळे 'पाणी'दाविले

टपोर मोती दवबिंदूचे
चमचम 'पाणी'पानावरती
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे
अळवावरचे अलगद 'पाणी'

कळी कोवळी कुणी कुस्करी
काळजाचे'पाणी'होते
ओंजळीतूनी 'पाणी'सुटता
कन्यादान...पुण्य लाभते

मायबाप हे आम्हां घडविती
रक्ताचे ते 'पाणी'करूनी
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडते 'पाणी'
तुडुंब,दुथडी नद्या वाहती
दुष्काळाचे सावट पडतां
सारे'पाणी..पाणी'करती

अंतीम समयी मुखात 'पाणी'
वेळ जाणवे निघण्याची
पितरांना मग 'पाणी' देऊन
स्मृती जागते आप्तांची

मनामनांतील भावनांचे
'पाण्या'मध्ये मिसळा रंग
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा
चेहर्या‍वरती उठे तरंग

खूपदा तुझ्या आठवणी

खूपदा तुझ्या आठवणी
पावलं न वाजवता येतात
आणि जाताना माझ्या मनाला
पावलं जोडून जातात
-चंद्रशेखर गोखले

Thursday, November 26, 2015

अमीर शाहरुख

मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/

Tuesday, November 24, 2015

अश्रू

पापणी आड दडलेले अश्रू
टचकन गालावर ओघळले
ह्रुदयीचे दुःख तुझ्या
काळजावर माझ्या वार करून गेले
वाटल तुला घ्याव जवळ
गालावरचे अश्रु ओठानी चुंबावे
पण अस तुझ रूप हे
वाटे , तुझ्याकडे पहातच रहावे
गुलाबी गुलाबी गालावर
अश्रु तुझे चमकले
शेवटी न रहावुन मी तुला
अलगद मिठीत घेतले
थरथरणारे तन तुझे
माझ्या मिठीत खुलले
तुझ्या ओठावरचे स्मितहास्य
नयनानी माझ्या क्षणात टिपले
सौ मनिषा पटवर्धन

Monday, November 23, 2015

।। गोष्ट छोटी, डोंगराएवढी ।।
त्या राजाला विश्वास असतो आपल्या प्रजेच्या प्रामाणिकपणावर. एकदा एक साधू राजाकडे येतो. राजा साधूला प्रजेच्या प्रामाणिकपणाविषयी सांगतो. ‘तेवढाच गुण आता दुर्मिळ होत चाललाय. तुझ्या प्रजेचं अभिनंदन ! पण मी तुझ्या प्रजेची एक छोटी परीक्षा घेऊ इच्छितो’, साधू बोलला. नगरात दवंडी पिटली. ‘राजवाड्याशेजारच्या हौदात प्रत्येक नागरिकाने एक लोटा दूध रात्री आणून टाकायचं.’ प्रत्येकजण हातात लोटा घेऊन हौदात दूध टाकून येत होता. हौदाकडे जाणारा कुणी एक असा विचार करत होता की, ‘इतक्या लोकांच्या दुधात आपले एक लोटा पाणी कोणाच्याच काय, देवाच्यासुद्धा लक्षात येणार नाही.’
सकाळी हौद उघडला. राजा हैराण झाला. हौदात फक्त पाणी होते. साधू महाराज अर्थपूर्ण हसले. नंतर राजा साधूसह राजवाड्यात निघाला. रस्त्यावर त्यांना एक गोड मुलगा हातात लोटा घेऊन हौदाकडे घाईघाईने जाताना दिसला. राजाने विचारल्यावर त्या मुलाने सांगितले, ‘झोपल्यामुळे रात्री हौदात माझे दूध टाकायचे राहून गेले. ते टाकायला जातोय.’ राजाने पाहिलं, तर खरंच त्या मुलाच्या लोट्यात दूध होतं.
‘मोठ्या लोकांना प्रामाणिकपणा ‘दाखवता’ येतो. काहींमध्ये तो असला तरी सर्वांत असेलच असं नाही. राजा, रात्री प्रत्येक माणूस लोटा झाकून नेत होता. रात्री तर अंधार होता ना? प्रामाणिक असणं या निरागस बाळासारखं उघड असतं. अशी मुलं आहेत, तोपर्यंत हे जग छान असेल. अशा मुलांना जप. त्यांच्यासाठी काही कर’, असं सांगून साधू निघून गेला.
गोष्टीतली ही मुलं खरी असतात का? परवा मी वरच्या गोष्टीतला मुलगा पाहिला. राज दत्तात्रय देसले असं त्याचं नाव. दुसरी-तिसरीत असावा. मी मनाने त्याला नमस्कार केला. तो कुणाला दिसणार नव्हता. निरपेक्ष कर्मयोगाची एक नाजूक कळी मला त्या मुलात दिसली. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, म्हणतात ना, अगदी असंच काहीतरी मी त्या बाळात पाहिलं. शाळा सुटली.
मुलं गलका करत घराच्या ओढीने शाळेच्या आवाराबाहेर पडत होती. त्यात हा राजही होता. पाठीला दप्तर, हातात पाण्याची बाटली. आमच्या शाळेच्या व्हरांड्यावरून मी ती मुलं पाहत होतो. राजने लक्ष वेधलं. त्याच्या हातातल्या बाटलीत बरंच पाणी उरलं होतं. वाकून तो ते पाणी सांडत होता. माझ्या शाळेतील पर्यावरणाचे शिक्षक मनोहर देसाई, मधू भांडारकर आम्ही जिज्ञासा म्हणून राजने जिथं वाकून पाणी टाकलं, तिथं पाहिलं, तर तिथे एक छोटं रोप लावलं होतं. त्या रोपाला राजने पाणी घातलं होतं. पाण्याचा सदुपयोग करणाऱ्या राजचं मला कौतुक वाटलं.
गोष्टीतल्या ‘त्या’ मुलाच्या आणि सत्यातल्या या ‘राज’सारख्या मुलांच्या माणूसपणाच्या रोपाला इथली कुटुंबव्यवस्था, शिक्षणव्यवस्था आणि समाजव्यवस्था आस्थेचं, प्रेमाचं आणि प्रेरणेचं पुरेसं पाणी घालू शकली तर या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरजच काय?
...कमलाकर देसले (मटा. ०५ मार्च २०१३)

Friday, November 20, 2015

एकदा मला ना

एकदा मला ना
तू माझी वाट पहाताना पहायचंय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळूच लपून रहायचंय
-चंद्रशेखर गोखले

Thursday, November 19, 2015

मी माझी रे! उरले नाही

मी माझी रे! उरले नाही

खोल कपारीमधील काळिज
कधी चोरले? कळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

विरहदाह मी शांत कराया
शीतल चांदण फुले माळली
स्वप्न बघू तर कसे बघू मी?
डोळ्यामध्ये प्रीत जागली
चंद्र भाळला! तुला सोडुनी
चित्त कुठेही रमले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

मेघ सावळा गेला भिजवुन
शहारलेले अंग मखमली
तरी पेटली यौवन काया
भाव मनी दाटले मलमली
बांध नको! मी नदी असोनी
अधी कधी खळखळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

स्वप्न रुपेरी नेत्री माझ्या
रंगवले अन् हरवलास तू
असे वाटते स्पंदनातुनी
माझ्यासंगे बहरलास तू
वादळातही निरव शांतता
पान एक सळसळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

काय हवे वेगळे याहुनी?
श्वास मिसळले तुझे नि माझे
मुक्त छंद क्षितिजावर गाऊ
विषय सुखाचे कशास ओझे?
चिरंजीव ही पहाट अपुली
इथे कधी मावळले नाही
शिकार झाल्या क्षणापासुनी
मी माझी रे! उरले नाही

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, November 18, 2015

मी कधी कधी

मी कधी कधी

मी कधी कधी
होतो खूप उदास
नसतो कधी जेव्हां
तुझा सहवास

मी कधी कधी
असतो खूप आनंदात
तू असलीस बरोबर की
साखर पडते दुधात

मी कधी कधी
होतो अस्वस्थ फार
उद्या संध्याकाळपर्यंत
तू नाही दिसणार

मी कधी कधी
विचारतो मनाला
अर्थ काय तुझ्याशिवाय
माझ्या जीवनाला ?

मी कधी कधी
होतो कासावीस
माझ्याशिवाय तू
रहात कशी असावीस ?

मी कधी कधी
ठेवतो मनाला सांगून
तू माझी झाली नाहीस
तर काय करू जगून

~अजित

माझे खुलेपण

माझे खुलेपण

Friday, November 13, 2015

किती सांगायचं मला

किती सांगायचं मला

बहीण: एक अनोखं नातं

बहीण: एक अनोखं नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
भाऊबीज च्या आपणा सर्वाना शुभेच्या

किती सांगायचं मला….

किती सांगायचं मला….

Wednesday, November 11, 2015

तू गेल्यावर वाटतं
खूपसं सांगायचं होतं,
तू खूपसं दिलंस तरी
आणखीन मागायचं होतं..
चंद्रशेखरजी गोखले

लक्ष्मी पूजन

समृद्धी यावी सोनपावली,
उधळण व्हावी सौख्याची,
भाग्याचा सर्वोदय व्हावा,
वर्षा व्हावी हर्षाची,
इंद्रधनुष्याचे रंग खुलावे,
शुभेच्छा ही दिपावलीची.
सर्व नागरिकांना दिपावलीच्या प्रकाशमय शुभेच्छा

Monday, November 09, 2015

गारवा

गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा

नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा

झुळूक मंद हासली
प्रीत मनी बहरली
मुग्ध मिठी पांघरण्या
तू हवा, तू हवा

वारा बघ जुल्मी हा
छेडितो पुन्हा पुन्हा
स्वैर बटा आवरण्या
तू हवा, तू हवा

भुरभुरत्या पावसात
भिजले मी नखशिखान्त
पदर जरा सावरण्या
तू हवा, तू हवा

जयश्री अंबासकर

Saturday, November 07, 2015

वसुबारस

वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

Friday, November 06, 2015

आठवणी

आठवणी

जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या

ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात

~(आठवणीत हरवून गेलेला) अथांग सागर

Wednesday, November 04, 2015

तुझी गहरी नजर

तुझ्याकडे येणारं
एक एक पाउल
मी खूप आशेने टाकायचो ...
तू गहिऱ्या नजरेने
बघायचीस मला
अन मी तिथेच
खिळून राहायचो ...

Tuesday, November 03, 2015

पुन्हा तुझ्या स्पर्शाचा तो कोवळा भास..

पुन्हा तुझ्या स्पर्शाचा
तो कोवळा भास
आणि क्षणात मी करून येते
काही वर्षांचा प्रवास...
~ चंद्रशेखर गोखले