Tuesday, February 17, 2015

उपवास... एक मनोगत !!

उपवास... एक मनोगत !!

दरवर्षी महाशिवरात्रीला मी नित्यनेमाने उपवास करतो.... अगदी कडक उपवास करतो... .सकाळी फक्त दूध घेतो !!

आता बाहेर पडताना ,आईने राजगिरा लाडू घे म्हणून नाट लावली... म्हणून फक्त चारच लाडू खाल्ले... ते सोडून द्या... लाडूने तोंड गोड झालं म्हणून थोडे शेंगदाणे घेतले इतकंच !!

बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

सकाळी सकाळी मंदीरात गेलो.... महादेवाचे दर्शन घेतले... तिथे प्रसाद म्हणून साबुदाणा थालीपिठ आणि शेंगदाण्याची ओली चटणी होती.... साक्षात महादेवाचा प्रसाद नाकारणे शक्यच नव्हते.... म्हणून गरम गरम मोजकी तीनच थालीपिठे घेतली... नंतर मंदीरातील महाराजानी स्वत:च्या हाताने दोन केळी दिली... साधू पुरुषासमोर विनम्र होउन त्यांचा आदेश शिरसावंद्य मानायचा हे घरातले संस्कार.... केवळ केळी खाल्ली !!

बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

म्हटलं आता रोजच्या कामाला लागू या ... तीन तासात कामं हातावेगळी केली... दुपार झाली... एका मित्राचा फोन आला म्हणून त्याच्या घरी गेलो... त्यांचा फराळ चालू होता... म्हणून मी म्हणालो ,नंतर येतो... वहिनी म्हणाल्या ,'भावजी बसा... थोडा फराळ करा....रताळ्याच्या चकल्या केल्या आहेत... साखर पाकातल्या... जरा महाशिवरात्रीचं पुण्य घेऊ द्या आम्हाला !!' आता झाली ना पंचाईत ?? आयुष्यात आपण कुणाच्या पुण्याच्या आड कधी आलो नाही.... .शेवटी संस्कारी घरातला मुलगा आहे... संस्कार वाया जाउ दिले नाहीत.... रताळाच्या चकल्या खाल्ल्या इतकंच !!

बाकी आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

अजून घरी जायचं आहे... घरच्या अन्नाचा मान राखायचा आहे... त्यानंतर सायंकाळपर्यंत एक कण सुद्धा पोटात जाउ देत नाही !!

कारण आपला उपवास एकदम कडक असतो बरं का !!

महशिवरात्रीच्या शुभेच्छा !!

No comments:

Post a Comment